“मातीतून उगवलेलं तेजस्वी जीवन”- स्व.हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी
“मातीतून उगवलेलं तेजस्वी जीवन”- स्व.हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी
जगात काही माणसं अशी असतात की त्यांची ओळख त्यांच्या नावावरून नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाच्या गहिर्या, शांत आणि प्रेमळ स्पर्शातून होते. त्यांना स्वतःबद्दल बोलण्याची गरज भासत नाही.त्यांच्या साधेपणात, त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमातच ते अजरामर होतात.
स्वर्गीय हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी हे असेच एक तेजस्वी आणि पवित्र व्यक्तिमत्त्व. मूडी प्रा. व पांझरा परिसरातच नव्हे, तर अनेकांच्या हृदयात “पितामह” म्हणून आज ही ते श्रद्धेने स्मरणात आहेत.
त्यांचा घराची परिस्थिती हलाखीची होती, पण मन मात्र विशाल होतं. लहानपणापासूनच त्यांनी शेतातील मातीचा गंध आणि आई-वडिलांच्या कष्टांचे व्रण मनात साठवले. त्या वेळीच त्यांनी जाणलं.शिक्षणच गरिबीचा अंधार दूर करू शकतं.
त्यामुळे एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन त्यांनी जुनी सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण, जरी मर्यादित होतं, तरी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ज्ञानाची मशाल ठरली.
त्यांची खरी ओळख मात्र शालेय सर्टिफिकेट मध्ये नव्हती, ती होती त्यांच्या कृतिशील जीवनशैलीत. शेती ही त्यांच्या जीवनाची केवळ उपजीविकेची साधनाच नव्हती,ती होती त्यांची जीवनाची आराधना. त्यांनी मातीला देव मानलं आणि कष्टांना पूजा.
गावातील, शिवारातील संकटांनी ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी आपुलकीने सामावून घेतलं. त्यांनी केवळ सल्ला दिला नाही, तर त्यांच्या सोबत राबून दाखवलं. त्यांचं आयुष्य म्हणजे शब्दांऐवजी कृतीतून दिलेला दिलासा होतं.
हिम्मतरावजींनी आपल्या मुलांना केवळ चांगलं शिक्षणच दिलं नाही, तर त्यांना चांगलं माणूस ही घडवलं. ते स्व. नामवंत डाॅ.योगेश सुर्यवंशी व श्री जयवंतराव भाऊसाहेब यांचे पिताश्री होते. त्यांचा दुसरा मुलगा वकील होऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आज ही गावी शेती करत आहे. हेच त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा आहे.
त्यांच्या डोळ्यांत काळजी होती, पण ती भीती नव्हती... ती होती गावाची, समाजाची, आणि भविष्यातील पिढ्यांची. त्यांच्या बोलण्यात मृदुता होती, पण त्यांच्या निर्णयांमध्ये अपार स्पष्टता होती.जेव्हा कुणी त्यांच्या नावाचा उच्चार करतो, तेव्हा तो केवळ स्मरण नसतो तो असतो मन:पूर्वक केलेला सश्रद्ध नमस्कार.
९६ वर्षांचे भरलेलं आयुष्य जगून ते या जगातून गेले, पण त्यांच्या आठवणी अजून ही आपल्या अंगणात आहेत.ओल्या माती सारख्या, जिवंत आणि सजीव...
त्यांचं आयुष्य म्हणजे एक उघडं पुस्तक ज्यात संघर्ष होता, प्रेम होतं, सच्चेपणाची गाथा होती आणि माणुसकीचा सुगंध होता.
आज त्यांच्या शरीराचा अस्तित्व आपल्या सोबत नाही, पण त्यांची माया, शिकवण, आणि त्यांचा आदर्श आपल्या प्रत्येक श्वासात आहे.ते गेले नाहीत… फक्त आपल्या नजरेआड झाले आहेत.
स्वर्गीय हिम्मतराव सूर्यवंशी यांना अश्रूपूरित, पण अभिमानाने भरलेली भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांचा जीवनप्रवास हेच आपल्याला सतत आठवण करून देतो.माणूस मोठा होतो तो पदाने नव्हे, तर त्याच्या पडद्या मागील निःस्वार्थ कर्तृत्वाने.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा