दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....!
दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....! दुसऱ्यांच्या पराभवाची वाट लावण्यात काही लोकांना एक विचित्र समाधान मिळते. जणू दुसऱ्याला खाली खेचले की आपण आपोआप उंचावतो, अशी त्यांची समजूत असते. परंतु जीवनाचा एक साधा, शांत आणि अटळ नियम आहे.दुसऱ्याची वाट लावताना आपण नकळत स्वतःचीच वाट लावत असतो. दुसऱ्यांच्या अपयशावर टाळ्या वाजवणारे हात कधीतरी स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू पुसताना थरथरतात. कारण नियती अत्यंत शांतपणे आपला हिशेब ठेवत असते. आपण कोणाच्या पायात अडथळे टाकतो, कोणाच्या स्वप्नांवर निर्दयपणे पाय देतो, कोणाच्या विश्वासाला तडा देतो. याची प्रत्येक नोंद वेळ आपल्या वहीत करत असते. त्या नोंदी कधी पुसल्या जात नाहीत; त्या योग्य वेळी परतफेडीच्या रूपाने समोर येतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणाऱ्याला क्षणभर वाटते.“मी जिंकलो!” परंतु तो हे विसरतो की अंधार पसरवण्यासाठी आधी स्वतःच्या मनात अंधार साठवावा लागतो. आणि ज्या मनात अंधार साचतो, तेथे शांतता, समाधान आणि आनंद हळूहळू नष्ट होऊ लागतात. बाहेरून विजयाचे हास्य असते, पण अंतर्मनात पराभवाची पोकळी दाटलेली असते. कुणाच्या अपयशाची खिल्ली उडवताना आपण...