मीच श्रेष्ठ अहंकारातून नम्रतेकडे जाणारा प्रवास...!
मीच श्रेष्ठ अहंकारातून नम्रतेकडे जाणारा प्रवास...! आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत आहे. या धावपळीत नकळत एक विचार मनात घर करून बसतो. “माझ्यासारखा मीच!” आपण जे करतो, ज्या पद्धतीने विचार करतो, जसे जगतो… तसे कोणीच नाही, असे आपल्याला वाटू लागते. स्वतःवर विश्वास असणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे; परंतु हा विश्वास जेव्हा अहंकारात परिवर्तित होतो, तेव्हा तो आपल्या डोळ्यांवर पडदा टाकतो. या जगात कोणीही पूर्ण नाही आणि कोणीही अंतिम नाही.इतिहास साक्षी आहे.असंख्य महान व्यक्ती या भूमीवर होऊन गेल्या. त्यांनी पर्वत हलवले, समुद्र पार केले, समाजाला नवी दिशा दिली, विचारांची क्रांती घडवली. तरीही काळाच्या प्रवाहाने त्यांनाही मागे टाकले. कारण प्रत्येक शिखराच्या पुढे आणखी एक शिखर असतेच. प्रत्येकाला “शेरास सव्वाशेर” असतो. ही केवळ म्हण नाही, तर जीवनाचे शाश्वत सत्य आहे. आपण कितीही यशस्वी झालो, कितीही मोठे झालो, तरी कुठेतरी कोणी तरी आपल्यापेक्षा अधिक कष्टाळू, अधिक बुद्धिमान, अधिक संयमी असतो. ही जाणीव आपल्याला कमी लेखत नाही; उलट ती आपल्याला अधिक समृद्ध बनवते. कारण खरे म...