स्वतःचा वकील, इतरांचा न्यायाधीश माणसं....!
स्वतःचा वकील, इतरांचा न्यायाधीश माणसं....! माणूस खरोखर विलक्षण आहे. तो संवेदनशील आहे, विचारशील आहे, समजूतदार आहे.परंतु अनेकदा ही समजूतदारी तो केवळ स्वतःपुरतीच जपतो. स्वतःकडून एखादी चूक घडली की तो मनात एक अदृश्य न्यायालय उभे करतो. त्या न्यायालयात तोच वकील असतो, तोच साक्षीदार असतो आणि शेवटी तोच निर्दोष ठरलेला आरोपी ही असतो. शब्दांचा आधार घेतो, कारणांची ढाल उभी करतो आणि स्वतःचाच खटला लढू लागतो. तो स्वतःलाच समजावतो “मी मुद्दाम केलं नव्हतं…” “परिस्थिती माझ्या हातात नव्हती…” “माझा हेतू चुकीचा नव्हता…” “मला कोणी समजून घेतलं नाही…” अशा असंख्य कारणांनी तो स्वतःला मोकळं करतो. स्वतःच्या अश्रूंना स्पष्टीकरण देतो, स्वतःच्या रागाला योग्य ठरवतो, स्वतःच्या वागण्याला परिस्थितीची किनार लावतो. त्याला स्वतःचे दुःख दिसते, स्वतःचा संघर्ष जाणवतो, स्वतःची अपूर्णता समजते. आणि मग तो स्वतःलाच माफ करून टाकतो.परंतु जेव्हा दुसऱ्याची चूक त्याच्या नजरेस पडते, तेव्हा चित्र पूर्णपणे बदलते. त्याच मनातले न्यायालय अचानक कठोर होते. तिथे सहानुभूती नसते, संयम नसतो, विचारांची जागा नसते. फक्त निकाल असतो. तो क्षणाचा...