आयुष्याची खरी तृप्ती.....!
आयुष्याची खरी तृप्ती.....!
या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो कोणी पैसा, कोणी यश, कोणी प्रेम… पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट असते तृप्ती. आणि ही तृप्ती नेमकी कशात आहे, हे अनेकांना आयुष्यभर कळत नाही.
काही जण आयुष्यभर साठवतात. पैसा, संपत्ती, वस्तू… अगदी नातीसुद्धा. पण त्यांचं साठवणं हे देण्यासाठी नसतं, तर स्वतःपुरतं ठेवण्यासाठी असतं. त्यांच्या मनात एक भीती असते. “काही कमी पडू नये.” आणि या भीतीतूनच जन्म घेतो लोभ.
लोभ माणसाला हळूहळू आतून रिकामं करत जातो. तो दुसऱ्याचा हक्क पाहत नाही, त्याला फक्त स्वतःचं पोट दिसतं. पण या पोटाची भूक विचित्र असते. जितकं भराल, तितकी वाढत जाते. अशा लोकांच्या घरात भरपूर अन्न असतं, पण जेवताना समाधान नसतं. त्यांच्या आजूबाजूला माणसं असतात, पण नात्यांमध्ये ऊब नसते. कारण त्यांनी घेतलं खूप, पण दिलं काहीच नाही.
आणि दुसऱ्या बाजूला असतात काही साधे, निरागस माणसं…
ज्यांच्याकडे फारसं काही नसतं, पण “नसतानाही देणं” ही त्यांची सवय असते. त्यांच्या हातात कदाचित एकच भाकरी असते, पण ती दोन तुकड्यांत तोडताना त्यांना आनंद होतो. कारण त्यांना माहीत असतं. वाटलेलं अन्न पोटापेक्षा मन भरतं.
अशा लोकांच्या आयुष्यात एक वेगळीच श्रीमंती असते. ती बँकेत दिसत नाही, पण लोकांच्या मनात साठलेली असते. त्यांनी दिलेलं एक स्मित, एक आधार, एक घास हे सगळं त्यांच्याकडे अनेक पटीने परत येतं.
त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण ते कधीच एकटे पडत नाहीत. कारण त्यांनी नाती कमावली असतात. आणि नाती हीच खरी संपत्ती असते.
खरं तर, “वाटणं” म्हणजे फक्त अन्न वाटणं नाही… ते आहे.वेळ वाटणं,प्रेम वाटणं,समजून घेणंआणि कुणाच्या दुःखात त्याच्यासोबत उभं राहणं. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी थोडं थांबतो, थोडं देतो, तेव्हा आपण फक्त त्याचं आयुष्य बदलत नाही. आपण स्वतःलाही समृद्ध करत असतो.
जीवनाच्या शेवटी माणूस रिकाम्या हातानेच जातो, पण मागे ठेवून जातो त्याच्या आठवणी. आणि त्या आठवणी कशा असतात, हे ठरतं त्याने आयुष्यात काय केलं यावर नाही… तर त्याने कसं वागलं यावर.हिसकावून घेतलेले क्षण लोक विसरतात, पण प्रेमाने दिलेला एक छोटासा घासही आयुष्यभर लक्षात राहतो.
म्हणूनच, आयुष्य जेव्हा तुम्हाला दोन वाटा दाखवेल एक, स्वतःसाठी साठवण्याची… आणि दुसरी, इतरांसाठी वाटण्याची…
तेव्हा क्षणभर थांबा… आणि स्वतःला विचारा “मी कोणत्या आठवणी मागे ठेवू इच्छितो?”कारण शेवटी, तुमचं नाव तुमच्या संपत्तीने नाही, तर तुमच्या माणुसकीने जिवंत राहतं.आणि जिथे वाटणं आहे, तिथेच खरा आनंद आहे… तिथेच समाधान आहे… आणि तिथेच खरं आयुष्य आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा