नोटांच्या आवाजात हरवलेलं अंतरात्मा....!
नोटांच्या आवाजात हरवलेलं अंतरात्मा....!
लाचेच्या पैशावर चहा पिणारा,आणि इमानाची भाषणं मोठ्या आवाजात देणारा…हा केवळ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव नाही, तर आपल्या समाजाच्या वेदनेचं प्रतिबिंब आहे.
लाच म्हणजे फक्त पैशांची देवाणघेवाण नव्हे; ती माणसाच्या अंतरात्म्याची विक्री असते. जेव्हा एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदारीच्या जागी बसलेला कुणीही व्यक्ती आपल्या पदाचा वापर लोकांच्या भल्यासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करतो, तेव्हा तो फक्त नियम तोडत नाही.तो विश्वास तोडतो. आणि विश्वास तुटला की नाती तुटतात, समाज तुटतो.
हातात नोटा असतात, पण त्या नोटांपेक्षा जास्त जड असतो तो निर्लज्जपणाचा भार. डोळ्यांत लाज नसते, चेहऱ्यावर बनावट प्रामाणिकपणाचा मुखवटा असतो. शब्द मात्र मोठे नैतिकतेची व्याख्यानं, प्रामाणिकपणाची उदाहरणं. पण आतून मात्र हव्यासाची आग धगधगत असते.
पोटासाठी घेतलं असतं तर कदाचित आपण क्षमा केली असती. कारण गरिबी कधी कधी माणसाला विवश करते. उपाशी पोटाने विचार करण्याची ताकदही कमी होते. पण हव्यासासाठी घेतलेली लाच ही विवशता नसते.ती जाणूनबुजून केलेली चूक असते. जास्त पैशासाठी, जास्त सुखासाठी, जास्त प्रतिष्ठेसाठी घेतलेला निर्णय. आणि तिथेच ते पाप ठरते.
लाच घेताना कदाचित तो माणूस विचार करत नसेल की त्याच्या एका सहीमुळे कुणाचं आयुष्य अडकलं आहे. एखाद्या शेतकऱ्याचं अनुदान थांबलं आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य रखडलं आहे, एखाद्या आजारी माणसाला वेळेवर मदत मिळाली नाही.त्या प्रत्येक वेदनेत त्याचा थोडासा हिस्सा असतो.
लाचेचा पैसा घरात सुखसोयी आणेल, पण मनातली शांतता हिरावून घेईल. कारण सत्यापासून पळून जाता येत नाही. आरशात पाहताना स्वतःची नजर चुकवावी लागते, तेव्हा समजतं.आपण कुठेतरी हरलो आहोत.
खरं प्रामाणिकपणं कधीच मोठ्या आवाजात सांगावं लागत नाही. ते शांतपणे जगावं लागतं. जेव्हा कुणी पाहत नाही, तेव्हा योग्य ते करणं.हीच खरी परीक्षा असते. इमान ही गोष्ट शब्दांत नाही, तर कृतीत दिसते.
समाज बदलण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नाहीत; मन बदलायला हवं. हव्यासावर नियंत्रण ठेवायला हवं. “मला अजून हवं” या विचाराऐवजी “मला योग्य तेवढंच पुरेसं आहे” हा विचार रुजायला हवा.
कारण शेवटी माणूस आपल्या पैशाने मोठा होत नाही.तो आपल्या स्वच्छ मनाने मोठा होतो.लाचेच्या पैशावर घेतलेला चहा गोड लागेल कदाचित, पण तो गोडवा तात्पुरता असतो. प्रामाणिक कष्टाने मिळालेल्या साध्या घोटात जी समाधानाची चव असते, ती कोणत्याही लाचेच्या पैशात नसते.
हव्यासासाठी घेतलेलं तेच खरं पाप असतं…आणि इमानासाठी उभं राहणं.तेच खरं धैर्य,तेच खरं माणूसपण.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा