तिरस्कार कितीही वाढू दे….!
तिरस्कार कितीही वाढू दे….!
जीवनाच्या प्रवासात कधी ना कधी असे क्षण येतात, जेव्हा आपली नितीमत्ता, आपलं चांगुलपण, आपली प्रामाणिकता आणि आपलं कर्तव्य यांच्याच कसोटीला उभं केलं जातं.कधी एखाद्या चुकीच्या आरोपांनी,
कधी अनपेक्षित गैरसमजांनी,कधी अचानक वाढलेल्या तिरस्काराने.
पण तरीही मनामध्ये एक आवाज पुन्हा पुन्हा फुलतो—
“तिरस्कार कितीही वाढू दे… आपण आपलं कर्तव्य करावं.”कारण कर्तव्य हे फक्त काम नसतं;ते आपली ओळख असतं,आपला स्वभाव असतो,आपलं व्यक्तिमत्त्व असतं.
धुरानं क्षणभर आकाश झाकतं,काळवंडून टाकतं…
पण त्यानंतर?वारा हलका सुटला तरी तो धूर विरतो.
आणि मग आकाश पुन्हा तसंच निळं, शांत, विशाल आणि सत्यासारखं स्थिर.
माणसांच्या मनातला तिरस्कारही तसाच असतो.तो फक्त धूर असतो.क्षणिक, दिशाहीन, आणि कायम टिकणारा कधीच नाही.
खरं तर, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालते,जेव्हा ती भले मोठ्याने न बोलता, पण मन लावून काम करत राहते,तेव्हा तिला थांबवण्यासाठी जग काही ना काही धूर निर्माण करतंच.
कधी बोलण्यातून,कधी नजरांमधून,कधी अफवांमधून.
पण आपण काय करायचं?थांबायचं? नाही.आपण फक्त आपल्या मार्गावर चालत राहायचं.कारण कर्तव्याचा प्रकाश कितीही धूर उठला तरी मंद होत नाही.आपण चांगुलपणातून जगलो,प्रामाणिकपणातून काम केलं,
आणि मन स्वच्छ ठेवलं…तर ते आकाशासारखं उजळतं
अढळ, अविचल आणि सुंदर.
द्वेषाने कोणाचेही आकाश काळे झाले नाही,पण कर्तव्याने मात्र अनेकांचे जीवन उजळून निघाले.
म्हणूनच लोक बदलू देत,त्यांची मतं बदलू देत,
भावना बदलू देत…आपण मात्र आपलं कर्तव्य, आपली माणुसकी आणि आपली प्रामाणिकता बदलू नये.
धुरानं आकाश कधीच काळं होत नाही…ते जसं पुन्हा निळं होतं,तसंच सत्य, प्रेम आणि कर्तव्यही अखेरीस जिंकतात.आणि त्या जिंकण्यातच आपल्या जगण्याचा खरा अर्थ असतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा