शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....!
शांततेतून उगम होतो नवजीवनाचा....! प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, पण एक गोष्ट मात्र सारखीच असते. सगळ्यांच्या वाट्याला येणारी वादळं. कधी ती दिसतात, कधी शांतपणे मनात घोंगावतात… पण त्या क्षणांना कोणीही चुकवू शकत नाही. काही वेळा आयुष्य इतकं कोसळतं, की आपल्याला वाटतं सगळं संपलं… पण अशा काळातच माणसाच्या खऱ्या ताकदीची ओळख होते. वादळं येणं हे चुकत नाही, पण त्यांना सामोरं जाण्याची पद्धत मात्र आपल्या हातात असते. काही क्षण असतात जेव्हा आपणही कोसळतो.मनाने, भावनांनी, विचारांनी… पण त्या कोसळण्याला थांबवायचं असेल, तर डोकं शांत ठेवणं, मन स्थिर करणं आणि परिस्थितीकडे एक पाऊल मागे घेऊन बघणं आवश्यक असतं. कारण कोणत्या ही संकटावर मात करणं म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर छोट्या छोट्या प्रसंगात स्वतःचं संयम टिकवणं असतं. जीवनात वाद असतील, मतभेद असतील, दुःख असतील. पण त्याच वेळी त्यांच्यातून समजून घेण्याची कला शिकली, तर प्रत्येक वाद एक संवाद बनतो. मतभेद माणसांमध्ये अंतर निर्माण करतात, पण जर त्या मतभेदांमध्ये समजूत आणि शहाणपणा असेल, तर तेच संबंध अधिक मजबूत करतात. खूप वेळा एखादं नातं क्षणात तुटतं....